|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.46° C

कमाल तापमान : 28.48° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 1.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.48° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 29.26°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.48°C - 29.09°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.38°C - 29.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.34°C - 29.57°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.81°C - 28.79°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.4°C - 28.7°C

sky is clear
Home » अग्रलेख, संपादकीय » आभाळ कोसळले असते काय?

आभाळ कोसळले असते काय?

आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार बनविणार आहे. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ७० पैकी केवळ २८ जागा मिळवणार्‍या आम आदमी पार्टीने दबावात येऊन सरकार न बनविण्याचा निर्णय घेतला असता, तर आभाळ कोसळले असते काय, असा प्रश्‍न आता विचारला जाऊ लागला आहे. सरकार बनविण्यासाठी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे पक्षावर दबाव असेलही, पण दबाव झुगारून विरोधी पक्षात बसण्याची किंवा नव्याने निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली असती, तर काय बिघडले असते, असाही प्रश्‍न विचारला जात आहे. या प्रश्‍नांची कोणतीही उत्तरं केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांकडे नाहीत, हे समजून घेतले पाहिजे. ज्या कॉंग्रेसवर आम आदमी पार्टीने आसूड ओढले, ज्या कॉंग्रेसला त्यांनी भ्रष्ट आणि बेईमान म्हणून निवडणुकीत कडवा विरोध केला, जोरदार प्रहार केले, त्याच कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार बनविण्याची हिंमत केजरीवाल यांनी कशी काय दाखविली, हाही प्रश्‍नच आहे. केजरीवाल यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहायला हवे होते. कॉंग्रेस आणि भाजपाला पाठिंबा देणार नाही आणि घेणारही नाही, ही भूमिका घेऊन ते ठाम राहिले असते, तर राष्ट्रपती राजवट लागू झाली असती, लोकसभा निवडणुकीसोबतच दिल्ली विधानसभेची पुन्हा निवडणूक झाली असती. या निवडणुकांना सामोरे जावे लागले अन् आतासारखे यश मिळाले नाही तर काय करायचे, हा प्रश्‍न केजरीवाल आणि कंपूला सतावत असल्यानेच कदाचित त्यांनी भ्रष्ट कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असे म्हणायला जागा आहे. भारतीय जनता पार्टीने जशी ठोस भूमिका घेतली तशी ठोस भूमिका घेण्यात आम आदमी पार्टी अपयशी ठरली. भाजपाने मनात आणले असते, तर आम आदमी पार्टीत फूट पाडणे सहज शक्य होते. लक्ष्मीनगर मतदारसंघातून निवडून आलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार विनोदकुमार बिन्नी यांच्यासारख्या आमदारांना फोडणे भाजपाला काही कठीण नव्हते. आम आदमी पार्टीने तयार केलेल्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज होत बिन्नी यांनी केजरीवाल यांच्या घरून काढता पाय घेत केजरीवाल यांच्याविरुद्ध मोठा गौप्यस्फोट करण्याची धमकी दिली होती आणि यावरूनच आम आदमी पार्टीत सगळे काही कुशलमंगल नाही, हे स्पष्ट होते. बिन्नींसारखे केजरीवाल यांचे अनेक सहकारी असतील. ते आज ना उद्या जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत पुढे येतील अन् मग आम आदमी पार्टीचा खरा चेहरा उघड होईल, यात शंका नाही. भाजपाने जशी भूमिका घेतली होती अशी भूमिका आम आदमी पार्टीलाही घेता आली असती. भाजपानेही मतदारांना भरघोस आश्‍वासनं दिली होती. सत्तेत आल्यास हे करू, सत्तेत आल्यास ते करू अशी अनेक आश्‍वासनं भाजपाने दिली होती आणि डॉ. हर्षवर्धन यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपदासाठी एक प्रामाणिक चेहराही समोर केला होता. पण, निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल न दिल्याने आणि सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास यश येईल याची खात्री नसल्याने, शिवाय तोडफोडीचे राजकारण करायचे नसल्याने भाजपाने उपराज्यपालांकडे आपली भूमिका स्पष्ट शब्दात विशद करीत सरकार स्थापन करण्यास नकार दिला. हेच केजरीवाल यांनाही करता आले असते. कारण, केजरीवाल यांच्या पक्षाकडे तर भाजपापेक्षाही चार जागा कमी आहेत. स्वत:च्या भावांना, आईबापाला ठार मारून सत्ता हस्तगत करण्यात आल्याची जगात अनेक उदाहरणं आहेत. सत्ता हस्तगत करण्यासाठी खालच्या स्तरावर उतरण्याची अन् त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणार्‍यांची संख्याही कमी नाही. भारतीय लोकशाहीत केजरीवाल यांनी जी कृती केली आहे तिची तुलना या बाबींशी करता येत नसली, तरी केजरीवाल यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो आत्मघातकी तर आहेच, लोकशाहीला मारकही आहे. ज्या कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आणि बेईमानीचे आरोप केले त्याच कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालविण्याची तयारी म्हणजे थुंकी चाटण्यासारखीच कृती होय. आम आदमी पार्टीचा जन्म हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी झाला असताना एका भ्रष्ट पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार चालविल्यास केजरीवाल यांच्या पक्षावरही भ्रष्टाचाराचा डाग लागणार आहे, याचा विसर या मंडळींना कसा काय पडला? ज्या अण्णा हजारे यांच्या सहभागाने लोकपालाच्या मागणीसाठी देशभर अभूतपूर्व आंदोलन झाले, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या मंडळींना एक राष्ट्रीय ओळख मिळाली, त्या अण्णा हजारे यांचा विरोध झुगारून केजरीवाल आणि कंपूने राजकारणात उडी घेतली, निवडणुका लढविल्या आणि आता आज ते भ्रष्ट कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सत्ताही स्थापन करीत आहेत, ही बाब कोणाच्याही पचनी पडणारी नाही.
कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आम आदमी पार्टीने जिवाचे रान केले. निवडणुकाही त्याच उद्देशाने लढल्या. दिल्लीतील सामान्य माणसांना एकत्र करून गल्लोगल्ली फिरून केजरीवाल यांनी जनमत आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला, तो खरोखरच प्रशंसनीय होता. त्यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने मिळविलेला विजयही नेत्रदीपक होता. देशभरच नव्हे, तर जगभरात या परिवर्तनाची चर्चा झाली. व्हायलाही पाहिजे होती. कॉंग्रेस आणि भाजपा यांनी स्वप्नातही आम आदमी पार्टीच्या अशा यशाची आणि स्वत:च्या पराभवाची कल्पना केली नव्हती. पण, भ्रष्टाचार आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेने आम आदमी पार्टीला कौल दिला अन् आश्‍चर्य घडले. हे आश्‍चर्य निकालांनंतर काही दिवस टिकून राहिले. पण, आम आदमी पार्टीने कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनविण्याचा निर्णय घेऊन आत्मघात करून घेण्याचे ठरविल्यानंतर या आश्‍चर्यालाही धक्का बसला. आम आदमी पार्टीला बाहेरून पाठिंबा देत कॉंग्रेसने फार मोठी राजकीय चाल खेळली होती आणि कॉंग्रेसच्या या खेळीला केजरीवाल बळी पडले. समजा केजरीवाल यांनी सरकार बनविले नसते, तर निवडणुकाच झाल्या असत्या, कदाचित केजरीवाल यांच्या पक्षाचा दारुण पराभवही झाला असता. पण, त्याने फरक काय पडला असता? ज्यांना कुठल्याही पदांचा मोह नाही, ज्यांना लाल दिव्याच्या गाड्या नको आहेत, ज्यांना राहायला सरकारी बंगले नको आहेत, ज्यांना जनतेची सेवा करायची आहे, ज्यांना महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देऊन सामान्य माणसाला दिलासा द्यायचा आहे, त्यांनी निवडणुकीतील पराभवाची एवढी चिंता करण्याची गरजच नव्हती. कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची तर मुळीच गरज नव्हती. कॉंग्रेसने पाठिंबा दिला आणि सरकारं अल्पावधीत पाडल्याची अनेक उदाहरणं आहेत. याला इतिहास साक्षी आहे. चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वातील सरकारं कॉंग्रेसने अल्पावधीत पाडली आहेत. आजही कॉंग्रेस म्हणते आहे की, आम्ही आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही. केजरीवाल यांच्या सरकारने चांगले काम केले, तर पाच वर्षे पाठिंबा देऊ अन्यथा विचार करू, असे कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखविले आहे. केजरीवाल यांना कॉंग्रेसचा स्वभाव माहिती नाही असे समजण्याचे काही कारण नाही. ते काही दूधपिते बाळ नाही. कॉंग्रेसचा स्वभाव आणि चरित्र या दोन्ही बाबी त्यांना चांगल्या ठावूक आहेत. असे असतानाही त्यांनी कॉंग्रेस संस्कृतीशी जवळीक करण्याचे धाडस दाखविले यामागे त्यांचा सत्तामोह तर नाही ना, असाही प्रश्‍न आता विचारला जात आहे.
आपल्या सोईची वेळ आणि परिस्थिती पाहून कॉंग्रेस केजरीवाल यांना केव्हा घरचा रस्ता दाखवेल, हे आम आदमी पार्टीला कळणारही नाही. केजरीवाल सारखे धमकावत आहेत की आपण सूत्रे स्वीकारताच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास सुरू करू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या फायली आधी उघडू, असेही त्यांनी म्हटले आहे. यात कॉंग्रेसच्याच नेत्यांवर पहिली आच येणार आहे. तेव्हा कॉंग्रेस ही बाब सहन करेल याची काहीएक शक्यता नाही. त्यामुळे केजरीवाल यांचा मूड पाहून कॉंग्रेस पाठिंबा काढून घेईल आणि दिल्लीला पुन्हा निवडणुकांना सामोरे जायला लावेल, यात शंका नाही.

Posted by : | on : 29 Dec 2013
Filed under : अग्रलेख, संपादकीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g