नवी दिल्ली, [४ मे] – गेल्या ९ फेबु्रवारी रोजीच्या कार्यक्रमात अफजल गुरूला श्रद्धांजली वाहताना भारतविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कठोर कारवाईच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन बेकायदेशीर असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी आज जाहीर केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी लोकशाही मार्गांचा अवलंब करावा, अशी सूचना कुमार यांनी केली आहे. आम्ही त्यांचे उपोषण बेकायदेशीर ठरवित असून, त्यांनी ते तात्काळ मागे घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
विद्यापीठाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी उपोषण सुरू केले असून, आज या उपोषणाचा सातवा दिवस आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याचेही वृत्त आहे.