किमान तापमान : 31.88° C
कमाल तापमान : 31.95° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.37 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.95° C
28.39°C - 32.02°C
few clouds29.01°C - 32.87°C
sky is clear28.92°C - 32.33°C
scattered clouds28.6°C - 31.92°C
sky is clear27.63°C - 30.08°C
sky is clear27.18°C - 29.55°C
sky is clearरायपूर, (५ जानेवारी) – देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी आरोग्य सेवांच्या बाबतीत अजूनही आपला देश खूपच माघारलेला आहे. त्यातच सरकारी रुग्णालय म्हटले की आधीच अंगावर काटा येतो. सगळीकडेच अशी परिस्थिती असतानाच छत्तीसगडमध्ये खाणकाम करणार्या मजुरांनी एक अद्ययावत रुग्णालय बांधले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. आता या भागातील गोरगरिबांची पहिली पसंत म्हणून हे रुग्णालय नावारूपाला आले आहे.
छत्तीसगडमधील औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या भिलई येथून ९५ किमी अंतरावर असलेल्या दल्ली राजहरा येथे उभारण्यात आलेल्या शहीद रुग्णालयात सध्या पाय ठेवायला जागा नाही. ११० खाटांचे हे तीन मजली रुग्णालय आहे. याशिवाय वरांड्यातही अनेक रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णालयात जागा नसल्याचा स्थायी फलक आम्ही लावला आहे. परंतु, तरीही या भागातील लोक उपचारासाठी आमच्याकडेच येतात, असे रुग्णालयाचे संचालक डॉक्टर शैवाल जना चिंता यांनी सांगितले.
नियोगींचे स्वप्न
दल्ली आणि राजहरा हे लोह खनिजाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही सरकारी कंपनी भिलई स्टील कारखान्यासाठी येथील खाणींमधून लोह खनिज काढत आहे. परंतु, शंकर गुहा नियोगी यांनी ७० च्या दशकात खाणकाम करणार्या मजुरांच्या संघटनेचे काम सुरू केल्यानंतर दल्ली राजहरा खर्या अर्थाने प्रकाशझोतात आले. या मजुरांना नियमित कर्मचार्यांप्रमाणेच बोनस व इतर सुविधा मिळाव्या यासाठी छत्तीसगड खाण कर्मचारी संघटनेच्या झेंड्याखाली सुमारे दहा हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. यानंतर नियोगी यांनी महिला व युवकांसाठी एक योजना तयार केली. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांच्या कर्मचारी संघटनेने काम सुरू केले. कुसुमबाई या एका महिलेला प्रसूतीच्यावेळी मदत न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आणि नियोगी यांनी महिलांच्या प्रसूतीसाठी एक दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. १०९ कर्मचार्यांची एक आरोग्य संघटना तयार झाली आणि १९८० साली बंद पडलेल्या गॅरेजमध्ये हा दवाखाना सुरू झाला. आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
७० च्या दशकात झालेल्या आंदोलनात मारल्या गेलेल्या ११ मजुरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. २८ सप्टेंबर १९९१ रोजी नियोगी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर सर्व काही संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, मजूर पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी सुरू केलेल्या लढ्याचा परिणाम म्हणून आज हे रुग्णालय उभे आहे. आज दररोज सुमारे २५० रुग्ण ओपीडीमध्ये येतात. रुग्णालयात स्वत:चे अद्ययावत ऑपरेशन थिएटर आहे. याशिवाय रेडियोलॉजी, पॅथॉलॉजी लेबॉरटरीसह तपासणी आणि उपचाराच्या सर्व सुविधा याठिकाणी आहेत.
फक्त पाच रुपये शुल्क
रुग्णांवर प्रारंभिक इलाजासाठी फक्त पाच रुपये शुल्क आकारले जाते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर खाटेसाठी पाच रुपये आणि सेवा शुल्क म्हणून २५ रुपये आकारले जाते. एका सर्जनसह सहा डॉक्टर कायम रुग्णालयात सेवा देत असतात. रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णालयाकडे स्वत:ची रुग्णवाहिकादेखील आहे.
चालविण्यात अनेक अडचणी
या रुग्णालयाचे संचालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी घेतला जात नाही. सर्व खर्च रुग्णालय व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना करते. परंतु, रुग्णालयापुढे दोन मुख्य समस्या असल्याचे संचालक डॉ. शैवाल जना यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही रक्तपेढी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु, अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. यामुळे दररोज होणार्या एक डझनपेक्षा जास्त शस्त्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होतात. यासंबंधीच्या नव्या कायद्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत, असेही त्यांनी सांगितले.