किमान तापमान : 28.5° C
कमाल तापमान : 29.53° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.35 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.5° C
27.38°C - 30.64°C
scattered clouds27.62°C - 30.93°C
sky is clear27.82°C - 31.09°C
sky is clear28.3°C - 31.08°C
sky is clear28.42°C - 30.7°C
sky is clear27.95°C - 30.1°C
sky is clear– भाजपाचा दारुण पराभव,
– कुमारस्वामींचे किंगमेकर बनण्याचे स्वप्न भंगले,
बंगळुरू, (१३ मे) – भाजपा आणि काँग्रेसकडे आलटून पालटून सत्तेची किल्ली सोपविण्याची मागील ३८ वर्षांपासून चालत आलेली परंपरा यावेळीही कर्नाटकने कायम राखली आहे. ही परंपरा बदलविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने कर्नाटकात १३७ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता खेचून आणली. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झाले. ७३.३९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला भाजपा आणि काँग्रेसमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, नंतर काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. दुपारपर्यंत चित्र आणखीच स्पष्ट झाले होते. सायंकाळपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले आणि २२४ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसने १३७ जागांसह स्पष्ट बहुमत प्राप्त केले. भाजपाला अवघ्या ६३ जागांवर समाधान मानावे लागले. तिथेच, यावेळीही आपण किंगमेकरच्या भूमिकेत राहू, असे स्वप्न पाहणारे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल २० जागांवर मर्यादित राहिला. राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर पक्षाच्या विस्तारासाठी कर्नाटकच्या मैदानात उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही.
विशेष म्हणजे, बेळगावमधील १८ पैकी ११ जागांवर काँग्रेसने आणि ७ जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठेही भोपळा फोडता आला नाही. नुकताच राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा गमावलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी या निवडणुकीत कोरीच राहिली.
जगदीश शेट्टर यांचा पराभव
उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा भाजपाचे उमेदवार महेश तेंगिनाकाई यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. हा मतदारसंघ शेट्टर यांचा बालेकिल्ला होता. शेट्टर कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना त्याच हुबळी धारवाड मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आज
कर्नाटकात एकहाती सत्ता आल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय रविवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकूण जागा २२४
काँग्रेस १३७
भाजपा ६३
जदएस २०
अन्य ०४
पराभवाची जबाबदारी स्वीकारतो : बोम्मई
शिगगाव – विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी मी पूणपणे स्वीकारतो. आगामी काळात एक जबाबदार विरोधी म्हणून पक्ष काम करणार आहे, असे कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले. अत्यंत संघटित निवडणूक रणनीती हे काँग्रेसच्या मोठ्या विजयामागील प्रमुख कारण असू शकते. मी अत्यंत आदराने जनादेश स्वीकारत आहे.
भाजपाच्या पराभवाची जबाबदारीही घेतो, यासाठी कुणी दुसरा जबाबदार नाही. मुख्यमंत्री म्हणून ही जबाबदारी मी स्वीकारत आहे. या पराभवाचे संपूर्ण विश्लेषण करण्याची गरज आहे. यामागे कित्येक कारणे आहेत, असे बोम्मई म्हणाले. आम्ही सर्व उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करू, स्वतःला संघटित करू. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहो. चुका सुधारून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी संघटनात्मक आणि प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक ती सर्व तयारी करू. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजपा काम करेल, असे बोम्मई यांनी सांगितले. मोदी आणि शाह या घटकाचा प्रभाव निवडणुकीवर पडला नाही का, या प्रश्नात बोम्मई म्हणाले, या पराभवाची वेगवेगळी कारणे आहेत. त्याचे विश्लेषण झाल्यानंतरच याबाबत बोलणे शक्य होईल.
जनादेश मान्य : येदीयुरप्पा
विधानसभा निवडणुकीतील जनादेश मान्य आहे तसेच पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीवर या निकालाचा परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी केले. कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांपैकी २५ जागा जिंकण्यासाठी पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे त्यांनी सांगितले.
जदएसची मते मिळाल्याने काँग्रेसचा विजय : फडणवीस
सरकार कायम बदलत असते. उत्तरप्रदेशच्या स्थानिक निवडणुका आम्ही जिंकल्या आहेत. भाजपाची मते कमी झालेली नाहीत. जदएसची मते मिळाल्यामुळे काँग्रेसचा विजय झाला. उत्तरप्रदेशातील निवडणुकीत भाजपा पूर्णपणे विजयी झाला आहे. जे उत्तरप्रदेश जिंकतात, ते देश जिंकतात, अशी प्रतिकि‘या उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
जनतेने भाजपाला शिकवला धडा : शरद पवार
लोकांना फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारणे आवडले नाही. त्यामुळे जनतेने आपल्या मतातून अशा प्रकारचे राजकारण चालणार नाही, असे स्पष्ट करीत भाजपाला धडा शिकवला असल्याची प्रतिकि‘या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. कर्नाटकातील निकाल ही लोकशाहीतील परिवर्तनाची नांदी आहे, दक्षिणेतील सत्ता भाजपाने गमावली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना : शिवकुमार
बंगळुरू – कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. या विजयाचे श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांना देतो. त्यांनी अपार कष्ट केले, त्यामुळे राज्यात खोटेपणाचा पर्दाफाश झाला, अशी प्रतिकि‘या त्यांनी व्यक्त केली.
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वढेरा यांना मी विजयाचे आश्वासन दिले होते. जेव्हा मी कारागृहात होतो, तेव्हा सोनिया गांधी मला भेटण्यासाठी तिथे आल्या होत्या. त्यावेळी मी पदावर राहण्यापेक्षा तुरुंगात राहणे पसंत केले. पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. डी. के. शिवकुमार यांनी कनकपुरा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. शिवकुमार यांचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. शिवकुमार यांनी राज्यात काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जावे, अशी मागणी समर्थकांकडून होते आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार पराभूत
अवघ्या महाराष्ट्रासह कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला तगडा झटका बसला आहे. बेळगामध्ये एकीकरण समितीला सर्वच जागांवर पराभवाचा सामना करावा लागला.
कर्नाटकात काँग्रेसचे प्रेमाचे दुकान
कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी बोलत होते की, ही लढाई आम्ही प्रेमाने लढलो. कर्नाटकातील जनतेने आम्हाला दाखवून दिले की या देशाला प्रेम आवडते. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आहे. प्रेमाची दुकाने उघडली आहेत. हा सर्वांचाच विजय आहे. हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. ते म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेला आम्ही निवडणुकीदरम्यान ५ आश्वासने दिली होती. पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्या मंत्रिमंडळात ही आश्वासने पूर्ण होतील.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कर्नाटकच्या जनतेला ५ आश्वासने दिले होते. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात सर्व महिलांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल, असे काँग्रेसने म्हटले होते.नवे शैक्षणिक धोरण रद्द करून राज्याचे शैक्षणिक धोरण लागू केले जाईल. ६३ सीमावर्ती तालुक्यांमध्ये कन्नड भाषा आणि संस्कृती विकसित केली जाईल आणि सर्व समुदायांच्या आशा आणि आकांक्षा सामावून घेण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५०% वरून ७५% पर्यंत वाढवली जाईल.काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा २ हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय बेरोजगार पदवीधरांना दरमहा ३,००० रुपये आणि दोन वर्षांसाठी बेरोजगार पदविकाधारकांना १,५०० रुपये प्रति महिना दिले जातील. याशिवाय रात्रीची ड्युटी करणार्या पोलिस अधिकार्यांना दरमहा ५ हजार रुपये विशेष भत्ता देण्याची घोषणाही करण्यात आली.