|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.54° C

कमाल तापमान : 30.17° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 59 %

वायू वेग : 5.8 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.17° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.61°C - 31.46°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

28.38°C - 30.55°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.8°C - 30.52°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.6°C - 30.29°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.11°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.54°C - 30.88°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक विजय

आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक विजय

=दिल्लीत भाजपा आणि कॉंग्रेसला दणका, १४ ला केजरीवालांचा रामलीलावर शपथविधी=
delhi-election-2015-arvind-kejriwal-s-aap-set-victoryनवी दिल्ली, [१० फेब्रुवारी] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने यावेळी इतिहास घडवला असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला अभूतपूर्व असे बहुमत मिळाले आहे. विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. देशातील कोणत्याही निवडणुकीत याआधी एवढे एकतर्फी यश खचितच कोणा राजकीय पक्षाला मिळाले असावे. भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले असून, कॉंग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. बहुतांश पराभूत उमेदवारांची अनामत रक्कम या निवडणुकीत जप्त झाली आहे. दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दिल्लीत सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणार्‍या भाजपाला फक्त तीन जागा जिंकता आल्या, तर मागील निवडणुकीत ८ जागा जिंकणार्‍या कॉंग्रेसला यावेळी एकही जागा जिंकता आलेली नाही. दिल्लीच्या निवडणूक निकालाने सर्वांनाच धक्का बसला आहे, तर पराभवाच्या गर्तेत फेकले गेलेल्या राजकीय पक्षांना आत्मपरीक्षणासाठी बाध्य केले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी ६० विधानसभा मतदारसंघात भाजपा आघाडीवर होती.
२०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक म्हणजे ३२ जागा मिळाल्या होत्या. आम आदमी पार्टीला दुसर्‍या क्रमांकाच्या २८ जागा मिळाल्या होत्या. ८ जागा जिंकत कॉंग्रेस तिसर्‍या स्थानावर होती. भाजपाला मागीलवेळी ३३ टक्के मते मिळाली होती. आपला २९ टक्के तर कॉंग्रेसला २५ टक्के मते मिळाली होती. यावेळी आपला सर्वाधिक म्हणजे ५४ टक्के मते मिळाली. आपच्या मतांच्या टक्केवारीत मागील निवडणुकीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भाजपाच्या मतांची टक्केवारी ३२ आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत फक्त एकाने घट झाली. तर कॉंग्रेसला फक्त १० टक्के मते मिळाली. म्हणजे कॉंग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत मागील निवडणुकीपेक्षा १५ टक्क्यांनी घट झाली आहे.
यावेळी तर दिल्लीच्या जनतेने धक्कादायक कौल दिला आहे. भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रो. जगदीश मुखी, कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यासह अनेक मान्यवरांचा दारुण पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे संयोजक आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल २६ हजार मतांनी विजयी झाले आहेत. आपच्या प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती, राखी बिर्ला यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा पराभव करणारे आपचे बग्गा जायंट किलर ठरले आहेत.
आज सकाळी ८ वाजता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला १४ केंद्रांवर सुरुवात झाली आणि पहिल्या तासातच दिल्लीत आपला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाले. पहिला निकाल बदरपूरचा लागला. याठिकाणी आपचे नारायण दत्त ६० हजार मतांनी विजयी झाले.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दूरध्वनी केला आणि पक्षाच्या नेत्रदीपक विजयासाठी त्यांचे अभिनंदन केले. राजधानी दिल्लीच्या विकासासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्वच सहकार्य करेल, अशी हमी पंतप्रधानांनी त्यांना यावेळी दिली. यानंतर मोदी यांनी ट्विटरवरही त्यांचे विशेष अभिनंदन केले. मोदी यांनी केजरीवाल यांना ‘चाय पे चर्चे’चेही निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे, मोदी आणि केजरीवाल यांच्यात प्रथमच फोनवरून चर्चा झाली.
केजरीवाल यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आम आदमी पार्टीची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक राहिली. त्यांच्या सरकारला आमच्या शुभेच्छा. दिल्लीचा विकास आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून या सरकारला आवश्यक ते सर्वच सहकार्य मिळेल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
१४ ला शपथविधी
लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून गेल्या वर्षी १४ फेबु्रवारीला दिल्लीच्या सरकारचा राजीनामा देणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी १४ फेबु्रवारी हीच तारीख निवडली आहे. रामलीला मैदानावर ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला दणदणीत विजय मिळाल्यानंतर पक्षाचे नेते आशुतोष यांनी याबाबतचीं माहिती दिली. गेल्या वर्षी १४ फेबु्रवारीलाच केजरीवाल यांनी सरकारचा राजीनामा दिला असल्याने, त्यांनी नव्या सरकारच्या शपथविधीसाठी तीच तारीख निवडली आहे, असे आशुतोष यांनी सांगितले. विशेष म्हणजे ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर सायंकाळी जनमत चाचण्यांनी आपले निकाल जाहीर केले आणि केजरीवाल यांनी आपल्या नातेवाईकांना शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रणही पाठविले.
विजयाचा जल्लोष
आम आदमी पार्टीच्या दिल्लीच्या पूर्व पटेलनगर भागातील केंद्रीय कार्यालयात आज विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल प्रचंड जल्लोष करण्यात आला. मतमोजणीत आपची आघाडी जसजशी वाढत गेली, तसतशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली. आपचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले होते. सर्वांच्या हातात अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर आणि कटआऊट होते. आपचे निवडणूक चिन्ह असलेला झाडू हातात घेऊन कार्यकर्ते बॅण्डवर बेभान होऊन नाचत होते. हजारोंच्या संख्येतील गर्दीवर पुष्पवृष्टी केली जात होती. गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जात होत्या. अरविंद केजरीवाल यांचे याठिकाणी आगमन होताच कार्यकत्यार्र्चा उत्साह आणखी वाढला, त्यांच्यासोबत आशुतोष, कुमार विश्‍वास, आशीष खेतान, संजयसिंह आणि अन्य नेते होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी घातली होती.
भाजपाने केला पराभव मान्य
भाजपाने विधानसभा निवडणुकीतील आपला पराभव मान्य केला आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आम्ही पराभव मान्य करतो, जनतेच्या कौलाचा आदर करतो, असे म्हटले. हा जनादेश केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध नाही, असे स्पष्ट करत नायडू यांनी पराभवाचे आम्ही विश्‍लेषण करू, असे सांगितले.
दिल्लीच्या जनतेचा मूड जेवढा आम आदमी पार्टीला समजला, तेवढा आम्हाला समजला नाही, अशी कबुली दिल्ली प्रदेश भाजपाचे प्रभारी खा. प्रभात झा यांनी दिली.
राजकारणात जय-पराजय होतच असतो. मात्र, एवढा दारुण पराभव आम्हाला अपेक्षित नव्हता. या पराभवामुळे आम्ही आत्मपरीक्षण करू, असे स्पष्ट करत खा. प्रभात झा म्हणाले की, पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे. कोणा एकाची नाही. तसेच पराभवाची अनेक कारणे आहेत, एक नाही. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नव्हे, तर पक्षाचा पराभव आहे, असे झा म्हणाले.

Posted by : | on : 10 Feb 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g