किमान तापमान : 29.11° C
कमाल तापमान : 29.34° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 4.74 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.11° C
28.78°C - 31.16°C
sky is clear29.09°C - 32.09°C
sky is clear28.98°C - 31.36°C
scattered clouds28.69°C - 31.09°C
sky is clear27.82°C - 29.39°C
sky is clear27.58°C - 28.91°C
sky is clearआगामी लोकसभा निवडणुकीत देशवासीयांनी पक्षाला पाहून मतदान न करता, देशासाठी मतदान करा-‘व्होट फॉर इंडिया’ असा नारा भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देत, पाच लाखांहून अधिक जनसमुदायाकडून तो वदवून घेतला. मुंबईच्या सर्वांत मोठ्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील मैदानावर रविवारी झालेल्या या विशाल जनसभेला पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांना होणार्या गर्दीची सर्वांनाच आठवण झाली. पण, अलीकडच्या काळातील मुंबईतील ही सभा सर्वांत मोठी होती, अशी प्रांजळ कबुली विरोधकांनीही दिली. भाजपाच्या या महागर्जना रॅलीला राज्यातील कोणत्याही पक्षाचे नेते कधीच विसरणार नाहीत, एवढी मोठी ही रॅली होती. महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीत नरेंद्र मोदींनी ‘व्होट फॉर इंडिया’ हा नारा देऊन देशाला एक नवा महामंत्र दिला. मोदींच्या या सभेकडे देशभरातील सर्वच राजकीय पक्षांचे आणि राजकीय पंडितांचे लक्ष लागले होते. मोदी काय बोलतात, याकडे सर्वच जण कान टवकारून बसले होते. मोदींनी आपल्या घणाघाती भाषणातून कॉंग्रेस पक्षाच्या एकूणच कुशासनाची लक्तरे वेशीवर टांगली. भाजपाशासित राज्यात विकासाची गंगा वाहत आहे, तर कॉंग्रेसशासित राज्यांत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे. आज देशातील सामान्य माणूस भ्रष्टाचार आणि महागाईमुळे त्रस्त झाला आहे. सार्या समस्यांचे मूळ हा कॉंग्रेस पक्ष आणि त्यांचे नेतेच आहेत. भाईयों और बहनो, याच मुंबईच्या अगस्त क्रांती मैदानावरून ‘अंग्रेजो भारत छोडो’ हा नारा देण्यात आला होता. त्याची आठवण ठेवून कॉंग्रेसला येणार्या निवडणुकीत ‘इंडिया फ्री कॉंग्रेस’चा याच मुंबईच्या भूमीवरून तुम्ही पक्का निर्धार करा आणि नवी क्रांती घडवा, असे आग्रही आवाहन त्यांनी केले.
देशातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधतानाच, मोदींनी महाराष्ट्रातील राज्यकर्ते कसे नाकर्ते आहेत, यावरही हातोडे मारले. गुजरात राज्य स्थापनेनंतर १४ मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात २६ झाले. यावरून या प्रदेशाचे राजकारण कसे असेल, हे सहज लक्षात येईल. येथे नवा मुख्यमंत्री आला की, त्याचे पाय ओढण्याचेच होते, असे सांगून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गलिच्छ राजकारणाचा त्यांनी समाचार घेतला. गुजरात हा महाराष्ट्राचा मोठा भाऊ आहे. महाराष्ट्र हे गुजराती भाषेचं माहेरघर आहे, असे उद्गार काढून मोदी यांनी आपल्या गुजराती बांधवांकडून शाबासकी मिळविली. शेतकर्यांकडे पाहण्याच्या आघाडी सरकारच्या उदासीन धोरणावर मोदींनी घणाघाती प्रहार केला. एकेकाळी पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश ही राज्ये अन्नधान्य उत्पादनात आघाडीवर होती. पण, आज चित्र बदलले आहे. आज मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही दोन भाजपाशासित राज्ये गहू आणि तांदळाचे विक्रमी उत्पादन करून दाखवीत आहेत, तर महाराष्ट्रातील शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, सिंचनाचे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात गेले आहेत, याकडे लक्ष वेधून मोदींनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शेतकरीविरोधी धोरणावर व सिंचन घोटाळ्यांवर प्रहार केला. भाजपाशासित राज्यात जसा शेतकरी सुखी आहे, तसा इथलाही शेतकरी भाजपाच्या राज्यातच सुखी होईल, अशी साद मोदींनी महाराष्ट्रातील शेतकर्यांना घातली. इथले राज्यकर्ते काय करतात? आपल्या देशाचे गौरवस्थान असलेल्या आयएनएस विक्रांत या पराक्रमी विमानवाहू नौकेचा लिलाव करून ती भंगारात काढणे, हे इथल्या आघाडी सरकारचे कटकारस्थान आहे. आता दोन दिवसांपूर्वी आदर्श घोटाळ्याचा अहवाल बाहेर आला. पण, मुख्यमंत्र्यांनी सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण केली. त्याच वेळी त्यांचा एक दिल्लीतील नेता (राहुल गांधी यांचे नाव न घेता) भ्रष्टाचार निर्मूलनावर भाषणे झोडीत होता. हा आहे कॉंग्रेसचा दुतोंडी चेहरा! येथे सरकारी नोकरी लागण्यासाठी पैसे मागितले जातात. गुजरातमध्ये असला प्रकार नाही. मुंबईतील व्यापार्यांच्या कळीच्या एलबीटीच्या मुद्याला हात घालताना मोदी यांनी, एलबीटी म्हणजे ‘लूट बांटने की टेक्निक’ असल्याचा जोरदार आरोप केला. गुजरातमध्ये टोलच्या स्वरूपात १४०० कोटी दर वर्षाला मिळतात. महाराष्ट्राला केवळ ४०० कोटी मिळतात. कुठे जातो टोल, असा चिमटाही त्यांनी काढला. मुंबईतील चित्रपटसृष्टीचे गेल्या शंभर वर्षांतील भरीव योगदान पाहून एक भव्य असे चित्रपट विद्यापीठ देशात स्थापन झाले पाहिजे, नवोदितांना ही कला शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही मोदी म्हणाले. आम्ही भारतीय चित्रपटसृष्टीची शताब्दी साजरी केली. या निमित्ताने एक मोठा परिसंवाद घ्यायला हवा होता. पण, ती संधी सरकारने गमावली, अशा शब्दांत मोदींनी शासनावर प्रहार करतानाच चित्रपटसृष्टीलाही आकर्षित केेले.
महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा समाचार घेत असतानाच, दिल्लीतील संपुआ सरकारच्या एकूणच कारभारावर मोदींनी घणाघाती टीका केली. आज देशात सर्वाधिक संख्या युवकांची आहे. पण त्यांना नोकरी नाही, रोजगार नाही. जगात कौशल्याला प्राधान्य दिले जात आहे. पण, दिल्लीचे सरकार केवळ कमिट्या स्थापित आहे. या समित्यांची तीन-तीन वर्षे बैठक होत नाही. ही आहे सरकारची युवकांकडे पाहण्याची वृत्ती! आज देशाला कौशल्यावर आधारित शिक्षण हवे आहे. युवकांच्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची गरज असताना संपुआ सरकार युवकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप मोदींनी केला. कारण, कॉंग्रेस पूर्णपणे अल्पसंख्यकांच्या व्होट बँकेच्या राजकारणातच आकंठ बुडालेली आहे, याकडे लक्ष वेधून कॉंग्रेसने अल्पसंख्यकांसाठी केले तरी काय? त्यांच्यासाठी अनेक योजना तयार केल्या, निधीची तरतूद केली, पण प्रत्यक्षात एकही पैसा त्यांच्या कल्याणासाठी खर्च झाला नसल्याचे सरकारी आकडेवारी सांगते, असे मोदी म्हणाले. आज देशात अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांच्या मुक्तीसाठी कॉंग्रेसमुक्त भारताची नितांत गरज असून, कॉंग्रेसचे चरित्र शोधल्याशिवाय देशाच्या समस्या सुटणार नाहीत. आम्ही चहा विकणार्या दहा हजार बांधवांना विशेष पासेस दिल्या आहेत. आमच्या देशातील प्रत्येक व्यक्ती व्हीआयपी झाली पाहिजे, हे आमचे स्वप्न असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली. आजच्या या विशाल मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हा संदेश गावागावांत पोहोचवून संपुआ सरकारच्या कारभाराची जाणीव करून द्यावी, असे आवाहन मोदींनी केले.
तिकडे राहुल गांधी यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांना राजीनामा देण्यास तडकाफडकी सांगितले. कारण काय, तर पर्यावरणाच्या नियमांवर नटराजन यांनी अनेक प्रकल्प अडवून ठेवल्याची तक्रार उद्योगपतींनी केली म्हणून! आणखी काही मंत्री रांगेत आहेत. उद्योगवर्तुळ मोदींकडे जात असल्याचे पाहून राहुल गांधी यांनी आपल्याच मंत्र्याचा बळी घेतला. राहुल हे सध्या कधी नव्हे एवढे गोंधळलेले दिसत आहेत. त्यांना काय करावे, हेही सुचेनासे झाले आहे. मोदींच्या झंझावातामुळे त्यांची झोप उडाली आहे. मोदींच्या आरोपांना कसे उत्तर द्यायचे, या विवंचनेने त्यांना ग्रासले आहे. पण, कोणताही उपाय करताना, तो आपल्यावरच तर उलटणार नाही ना, याचा सारासार विचार करूनच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. आज ते म्हणतात, भ्रष्टाचार देशाचे रक्त पीत आहे. पण, त्याचे निराकरण ते कसे करणार? भ्रष्ट नेत्यांना घरी बसवणार? त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करणार? काय करणार आहेत ते? कॉंग्रेसने आता भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही टाहो फोडला, तरी त्यावर आता कुणाचा विश्वास बसणार नाही, अशी वेळ येऊन ठेपली आहे. कॉंग्रेस कार्यकर्ता संभ्रमात आहे. त्याला कुठे जावे हे सुचेनासे झाले आहे. त्यांना कॉंग्रेस पक्ष कसा सांभाळणार आहे? त्यामुळेच मणिशंकर अय्यर बोलून गेले होते-कॉंग्रेसने आगामी निवडणुकीत विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवावी. समझदार को इशारा काफी है…