=मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचा वर्धापन दिन=
नागपूर, [१ फेब्रुवारी] – येत्या काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनी सुद्धा या बदलासाठी पुढाकार घ्यावा व मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगणा एमआयडीसी असोसिएशनच्या वर्धापन दिन समारंभात उद्योजकांना केले.
यावेळी व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन सी. एम. रणधीर, उपाध्यक्ष जी. एल. निमा, सचिव चंद्रशेखर शेगावकर, कोषाध्यक्ष शेखर बेंद्रे उपस्थित होते.
जगातील औद्यागिक वातावरण झपाट्याने बदलत आहेत. भारताबदल जगातील उद्योगपतींना कुतूहल आहे. आपल्या देशात गुंतवणूक करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. डावोस येथील जागतिक इकॉनामिक फोरमच्या सभेत मला हे चित्र जाणवले, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जगातील उद्योजकांसोबत संवाद साधून गुंतवणूक वाढविण्याच्या प्रयत्नासोबतच देशातील उद्योजकांसोबत संवाद वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच मेक इन् इंडिया तसेच मेक इन् महाराष्ट्र ही संकल्पना उद्योगवाढीसाठी पुढे आली. यात कामगार कायदे अडचणीचे ठरू नये, यासाठी सर्वसमावेशक असा कामगार कायदा तयार करण्याचे प्रयत्न आहेत. उद्योग आणि कामगारांच्या हितांचे सर्वसमावेशक धोरण असणारा कामगार कायदा असल्यास उद्योगवाढीसाठी त्याचा निश्चितपणे फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुशल कामगार निर्मितीसाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. उद्योगांमध्ये कशाप्रकारच्या कुशलतेची गरज आहे याची वेळोवेळी शासनास माहिती दिल्यास त्या दिशेने प्रयत्न करता येईल. या संदर्भातला मसुदा शासन तयार करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योग जगतातील अडचणी सोडविण्यासाठी उद्योग मित्र ही संकल्पना आवश्यकच आहे. पण केवळ त्या ठिकाणी न थांबता थेट शासनाशी संवाद साधल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतात. प्रादेशिक अधिकार्यांना तसे अधिकार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष सी. एम. रणधीर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात हिंगणा एमआयडीसीत मोठया प्रमाणात कामगार काम करीत असल्यामुळे एक सुसज्ज रुग्णालय, तसेच इतर मागण्यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्योजक व माजी पदाधिकार्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन रेणुका देशकर यांनी केले.