|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.51° C

कमाल तापमान : 28.94° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 2.99 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.94° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.24°C - 30.18°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.16°C - 30.18°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.76°C - 28.89°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.48°C - 29.11°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.32°C - 28.94°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.07°C - 29.18°C

sky is clear
Home » अग्रलेख, संपादकीय » रामराज्य अवतरणार…

रामराज्य अवतरणार…

आर्य चाणक्याने, राजाने कसे वागावे, कसा व्यवहार करावा, प्रजेचे रक्षण कसे करावे, राज्यशकट हाकण्यासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठी कररचना कशी असावी, संकटाच्या वेळी कसे वागावे, मित्र आणि शेजार्‍यांशी संबंध कसे असावे, शिक्षणपद्धती कशी असावी, शत्रूला कशी वागणूक द्यावी… याबाबतचे अनेक कानमंत्र भारतीय राज्यकर्त्यांना देऊन ठेवले आहेत. आदर्श राज्याची संकल्पनाही त्यांनी मांडून ठेवली आहे. राजाने न्याय-निवाडा करताना जाती-पाती, धर्म-पंथ, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, शत्रू-मित्र असे कुठलेही भेद न पाळता, गुन्हेगाराला शिक्षा होईल, अशी कृती केली तर त्याची कीर्ती दिगंतापल्याडही जाईल, हे भाकीतही त्यांनी करून ठेवलेले आहे. राजा प्रजाहितदक्ष असला पाहिजे, असे आर्य चाणक्याचे सर्वांत महत्त्वाचे तत्त्व आहे आणि त्याच तत्त्वाचे पालन करण्यास सध्याचे कॉंग्रेस सरकार आणि या सरकारचे नेतृत्व करणारे सरदार मनमोहसिंग यांना सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यात कुठलाच राम राहिला नसून सर्वत्र असंतोषाचे स्फोटक वातावरण आहे. कॉंग्रेसच्या शासनकाळात नाहीसे झालेले रामराज्य पुन्हा या भूवर अवतरावे, अशी मागणी देशभरातील जनता करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या बर्‍याच आशा, अपेक्षा आणि आकांक्षा आहेत. वर्धेतील सभेत आणि त्यानंतर यवतमाळात झालेल्या ‘किसान पे चर्चा’मध्ये मोदींनी त्यांच्याबाबत व्यक्त होत असलेल्या अपेक्षांबाबत ते खरे उतरतील, याची दिलेली ग्वाही देशातील बदलणार्‍या हवेमुळेच होती.
एकदा सत्ता द्या, कॉंग्रेसने जे ६० वर्षांत केले नाही ते आम्ही अवध्या ६० महिन्यांत करून दाखवू! या आश्‍वासनाने मतदारांमध्ये किती म्हणून उत्साह संचारला की, कालपर्यंत हाताच्या निशाणीखेरीज दुसर्‍या कुठल्याच चिन्हांचा विचार न करणारे मतदार, देशाच्या सुख-समृद्धीसाठी ‘हर हर मोदी, घर घर मोदी’चा नारा देऊ लागले आहेत! यंदा कॉंग्रेसमध्ये उमेदवार मिळण्याची मारामार आहे. चिदम्बरम् यांच्यासारखे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा आदेश धुडकावून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहेत; तर काहींनी निवडणूक लढविण्याची इच्छाच नसल्याचे पक्षश्रेष्ठींना परस्पर कळविले आहे. तिकडे नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे वाराणशीमधून उमेदवारीचे बाशिंग बांधण्याची कॉंग्रेसच्या एकाही नेत्याची तयारी नाही. यासंदर्भात सचिन, सेहवागचीही चाचपणी झाल्याचे वृत्त फुटले आणि या दोघांच्याही नकारामुळे कॉंग्रेसमधीलच नव्हे, तर अराजकीय सेलिब्रे्रटींनीही मोदींची किती धास्ती घेतलीय्, हेच सिद्ध झाले! एरव्ही कॉंग्रेसचे तिकीट म्हणजे अगदी दगडदेखील निवडून येण्याची खात्री असल्याने ते कुठले का असेना, मिळविण्यासाठी होणारी धडपड आपण अनुभवतोच आहे.
मोदी म्हणत होते त्याप्रमाणे जसजसा मतदानाचा दिवस जवळ येईल, तसतशी परिस्थिती वेगाने बदलत जाईल, हे खरे ठरत आहे. भाजपाची लाट खरोखरीच त्सुनामीत परिवर्तित होत असल्याचा अनुभव या देशातील जनतेला येत आहे. एकदाच सत्ता हाती द्या, भविष्यात पुन्हा म्हणून शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळीच येणार नाही, या त्यांच्या व्यक्तव्यावर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे परिवार इतके भाळले की, त्यांनी ‘नमो राग’ आळवण्यास प्रारंभ केला. आजवर शेतकर्‍यांच्या गावात येऊन त्यांच्यासोबत ‘किसान पे चर्चा’ करणारा नेता या देशाने अनुभवला नव्हता. हा नेता नुसताच घोषणा करणारा नाही, फक्त सहानुभूती दाखवणारा नाही आणि निव्वळ बाताड्या तर नाहीच नाही, हे बळीराजाने ताडले. या नेत्याजवळ रामराज्य साकार करण्याच्या योजनाही आहेत. शेतकर्‍यांसाठी, कष्टकर्‍यांसाठी, बेरोजगारांसाठी, कारखानदारांसाठी, स्त्रीशक्तीसाठी, उत्पादकांसाठी, कर्मचार्‍यांसाठी, शिक्षण क्षेत्राच्या उत्थानासाठी, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी, ड्रीम सीटीज्‌साठी, समर्थ आणि समृद्ध भारतासाठी आणि ज्या ज्या लोकांना उत्थानाची ललक लागली आहे, त्या सार्‍यांसाठी या जादूगाराच्या पेटार्‍यात उपाय आहेत! लहानपणी ‘फेरीवाल्या फेरीवाल्या तुझ्या गाडीत काय? तुझ्या गाडीत काय…?’ असा प्रश्‍न विचारणारे कवी शरद मुठे यांचे जाणता राजा शिवरायावर रचलेले एक लोभसवाणे सुरेल गीत अनेकांनी ऐकले असेल; आणि या प्रश्‍नाला फेरीवाल्याने तितक्याच तडफेने बोबडबोलात दिलेले उत्तरही आपणास ठाऊक असेल-
फेरीवाला म्हणतो, सांगू!
लाकडाचा काऊ आहे, रबराची माऊ आहे|
मातीचा आऊ आहे, प्लास्टिकची चिऊ आहे
राणी आहे – राजा आहे, फू-फू वाजे बाजा आहे|
चेंडू आहे, शिट्टी आहे, दांडू आहे विट्टी आहे|
देऊ तुम्हाला काय यातले, लवकर आता बोला…|
याशिवायही फेरीवाला त्याच्याजवळच्या वस्तूंची लांबलचक यादी सांगतो. अखेर तो शिवबाच्या शूरवीरपणाचे वर्णन करून त्याची मूर्तीदेखील माझ्याजवळ असल्याचा खुलासा करतो. तेव्हा सारी बालबहादूर मंडळी आम्हाला तुझ्याजवळच्या मातीच्या, रबराच्या अन् लाकडाच्या नकली वस्तूत स्वारस्य नाही, आम्हाला हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्याचा विडा उचलणार्‍या शिवबाचीच मूर्ती हवी, असा एकसुरात उच्चार करतात. या गीतातील भावार्थाप्रमाणेच, या देशातील जनतेला खोट्या घोषणा नकोत, तर त्यांना या देशाचे जाणत्या राजाप्रमाणे रक्षण करणारा एक सजग, सशक्त, गरजणारा, द्रष्टा, दूरदर्शी, विरोधकांच्या चिंधड्या उडवणारा एक महाप्रतापी राजा मोदींच्या रूपात हवा आहे; आणि का असू नये त्यांची ही अपेक्षा? आजवरच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील एकाही पंतप्रधानाला इतकी दूरदृष्टी कधीच लाभली नाही. त्यांच्याजवळ नुसते डोळे होते पण होता दृष्टीचाच अभाव! मोदींजवळ डोळेच नाहीत तर दृष्टीही आहे आणि तीदेखील दूरदृष्टी आहे. म्हणूनच ते समाजातील निरनिराळ्या घटकांचा विचार सहानुभूतिपूर्वक करतात आणि त्यांच्या समस्यांवर उपायही सांगतात.
आपल्या विदर्भातच शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे गेंड्याच्या कातडीचे लोक, शेतकरी आत्महत्यांमध्येही खोट काढतात. शेतकरी कर्जबाजारीपणा आणि दुबार-तिबार पेरण्यांमुळे तसेच गारपिटीमुळे, अवर्षणामुळे नव्हे, तर दारूच्या आहारी गेल्यामुळे मृत्यूला जवळ करतोय्, असा त्यांचा निष्कर्ष, त्यांच्यातील असंवेदनशीलतेचाच परिचय देणारा आहे. आत्महत्येनंतर, परिवाराला मिळणार्‍या लाखाच्या गड्डीकडे बळीराजाची नजर असते, ही तर शेतकर्‍याच्या कष्टाची उडविलेली खिल्लीच म्हणावी. मोदींच्या पेटार्‍यात शेतकरी उत्थानाच्या अनेक योजना आहेत आणि ते नुसतेच योजना सांगत नसून, त्यांनी त्यांच्या राज्यात त्या राबवून बळीराजाला सुख-संपन्नही केले आहे. त्यांचे बोल अनुभवाचे आहेत. जेव्हा, शेतातील धुर्‍यावर निरनिराळी फळं-फुलझाडे लावा आणि लाकडाच्या आयातीपासून जन्मजन्मांतरीची मुक्ती मिळवा, असे ते सांगतात, तेव्हाच त्यांच्यातील प्रशासकीय दृष्टीचा परिचय येतो. देशात ‘जय जवान – जय किसान’चा नारा तर दिला जातो, पण येथील शेतकरी कसा देशोधडीला लागलाय्, याचेही नमुने ते देतात. सरकारच्या पॅकेजचे चिथडे उडवताना शेतकर्‍याला सिंचनाची सोय, बी-बियाणे, खते, रासायनिक औषधे, जमिनीचा सात-बारा, साठवणूक केंद्रे आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तर आज तुमच्या दारी येणारा शेतकरी तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घातल्याशिवाय राहणार नाही, हेदेखील ते सांगून जातात. मोदींचा पेटारा आपल्याने उकलणारा नाही. तो चहावाल्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतच्या खडतर प्रवासातील भल्याबुर्‍या अनुभवाने समृद्ध झालेला आहे. त्यांच्या समृद्ध अनुभवातूनच आपल्या देशात रामराज्य साकारणार आहे, ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. रामनवमीच्या पर्वावर मोदी, त्यांचा पक्ष, त्यांचे समर्थक आणि त्यांच्या सार्‍या भारतीय बांधवांना रामराज्य साकरण्याचे बळ मिळावे म्हणून आपण योग्य आणि शतप्रतिशत मतदान करण्याची शपथ घेऊ या!

Posted by : | on : 23 Mar 2014
Filed under : अग्रलेख, संपादकीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g